तुळजापूर प्रतिनिधी
सध्या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असताना आणि प्रदूषणाच्या दुष्परिणामांची झळ बसत असताना, श्री तुळजाभवानी ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या छात्राध्यापकांनी प्रभावी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम राबवला.
‘उन्हाळा आला रे’ आणि ‘श्वास अडकतोय’ या दोन विषयांवर आधारित पथनाट्यांचे सादरीकरण बस स्टँड व आई तुळजाभवानी मंदिर परिसरात करण्यात आले. पहिल्या पथनाट्यात उन्हाळ्यात घ्यावयाच्या काळजीवर प्रकाश टाकण्यात आला, तर दुसऱ्या पथनाट्यात प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना यावर भर देण्यात आला.
छात्राध्यापकांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित नागरिक, प्रवासी, पुजारी बांधव व भाविक भाऊक झाले. या वेळी प्राचार्य एस.एन. दोंड, प्रा. एस.आर. कोळी व शिक्षक व्यक्तिमत्त्व विभाग प्रमुख प्रा. विवेक कोरे उपस्थित होते. पथनाट्याचे लेखन, दिग्दर्शन व मार्गदर्शन प्रा. विवेक कोरे यांनी केले.
सामाजिक भान जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे समाजप्रबोधन अधिक प्रभावीरीत्या होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.