घरकुल योजनेसंदर्भात विशेष बैठक- ८१,०२७ कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण १८ जूनपर्यंत अंतिम मुदत
धाराशिव प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या निवडीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकूण ८१,०२७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सुचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठकीदरम्यान दिली. यावेळी या बैठकीला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. प्रविण स्वामी यांची ऑनलाईन बैठकीस उपस्थिती होती.
धाराशिव जिल्हयातील लाभार्थींचे सर्वेक्षण सुरु असून तालुकानिहाय पात्र कुटुंब पुढीलप्रमाणे आहे. धाराशिव – १८,०००, तुळजापूर – १६,५५२, कळंब – ११,६५२, उमरगा – १०,३३५, परांडा – ९,३८६, भूम – ६,३५१, वाशी – ४,५७६, लोहारा – ४,१९८ एकूण ८१,०२७ कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणासाठी १८ जून २०२५ ही अंतिम मुदत आहे. यापुढे मुदतवाढ कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित करून लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.
शहरी भागातील पात्र लाभार्थींना या योजनेंतर्गत घरकुलाकरीता 2 लाख 40 हजार रुपये तर ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना 2 लाख 10 हजार अनुदान देण्यात येत असून पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन देखील करण्यात आले आहे.
ज्या कुटुंबाकडे घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा पात्र कुटुंबांचाही सर्वे करण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेची मुख्य जबाबदारी ग्रामसेवकांवर असेल असे बैठकीदरम्यान निश्चीत करण्यात आले आहे. प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना या अभियानात पूर्ण क्षमतेने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, लाभार्थ्यांच्या निवडीत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यावर भर देण्यात आला आहे.
या बैठकीसाठी जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, विलास जाधव, प्रकल्प संचालक, शाम गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं), मेघराज पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.