तुळजापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) धाराशिव आणि हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता नगरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक ‘पाणीहटी दही चिडा’ उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा उत्सव पश्चिम बंगालमधील पाणीहटी गावात श्रील रघुनाथ दास गोस्वामी आणि श्री नित्यानंद प्रभू यांची ऐतिहासिक भेट याच्या स्मरणार्थ दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा केला जातो.
या पावन उत्सवामध्ये दही, पोहे, दूध, आंबा, सफरचंद, केळी, साखर, भीमसेन कापूर आणि सुकामेवा यांचा वापर करून खास ‘दही चिडा’ तयार केला जातो. हे अन्न प्रथम भगवान श्रीकृष्णास नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते आणि त्यानंतर भाविकांना प्रसादरूपाने वाटप केले जाते.
यंदाच्या कार्यक्रमात ७० ते ८० हरे कृष्ण भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, संकीर्तन, हरिनाम व भक्तिगीतांमधून भक्तीमय वातावरण निर्माण केले. इस्कॉन तर्फे चालविल्या जाणाऱ्या नियमित सत्संग, हरिनाम जप आणि नामस्मरणामुळे तुळजापूर शहरात भक्तीचा जागर होत असल्याचे पाहायला मिळते.