तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेतली असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवार, दिनांक 14 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता तुळजापूर शहरात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा श्री तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारापासून सुरू होऊन आर्य चौक, कमान वेस, धाराशिव रोड, जुने बसस्थानक, गोलाई मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त होणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने व माजी मंत्री मा. अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत काँग्रेस पक्षाने सातत्याने आक्षेप नोंदवले असून, अद्यापही त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष अॅड. धिरज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, सर्व फ्रंटल सेल्स, तालुका अध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हा मशाल मोर्चा हे केवळ निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारे आंदोलन नसून, लोकशाही रक्षणाचा निर्धारही असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.