जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची, रविंद्र केसकर यांचे प्रतिपादन

mhcitynews
0

 

व्याख्यानातून साधला विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

तुळजापूर प्रतिनिधी

जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे. वाचनाने आकलन करून समजून घेणारी माणसं प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. प्रश्न निर्माण झाले तरच उत्तराची आशा निर्माण होते, त्यातूनच ज्ञानात भर पडते. वाचन आपल्याला ज्ञानसंपन्न बनवते, असे प्रतिपादन व्याख्याते रविंद्र केसकर यांनी केले. ते मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूरच्या वतीने आयोजीत व्याख्यानात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तुळजाभवानी सैनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. एस. बी. पेटकर, म.सा.प.चे अध्यक्ष अमर हंगरगेकर, कार्यवाह विजय देशमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी रविंद्र केसकर यांनी, वाचन माणसाला विचारशील आणि सुसंस्कृत बनवते. आयुष्यात यशस्वी होण्याकरिता वाचन महत्वाचे आहे. आजवर जगात जी माणसे तत्वज्ञानी म्हणून गणली गेली ती सर्व अगोदर वाचनाने समृद्ध झाली. त्यातूनच त्यांनी जगाला ज्ञानमार्ग दाखवला. साने गुरुजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,  प्र. के. अत्रे अशी कितीतरी व्यक्तीमत्त्वं त्यांच्या वाचनाने घडवली. आणि त्यांनी इतरांना ज्ञानाचा उजेड दाखवला.

ज्या मुलांना आईच्या हाताचे घट्टे आणि वडिलांच्या पायाच्या भेगा वाचता येतात, ती जाणीव ज्यांना कळते त्यांनाच आयुष्याचे पुस्तक खऱ्या अर्थाने वाचता येते. नुसती घोकंपट्टी म्हणजे वाचन नव्हे, तर वाचलेलं किती आकलन केलं, समजून घेतलं हे महत्वाचे असते. वाचनाने विचारशीलता येते, त्यातून कृतीशील पिढीची जडणघडण होत असते, असे प्रतिपादन केले.

मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये संस्कारमूल्यांची जोपासना व्हावी यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दि. १६ जानेवारी २०२३ रोजी तुळजाभवानी सैनिक विद्यालयातील सभागृहात हा उपक्रम पार पडला.

सुप्रसिद्ध वक्ते, पत्रकार, साहित्यिक रविंद्र केसकर यांनी " वाचाल तर दिसेल " या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. आपल्या हलक्या फुलक्या, ओघवत्या शैलीत त्यांनी वाचनाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी देवीचे प्रतिमापूजन करण्यात आले. म. सा. प. तुळजापूरच्या वतीने सैनिक विद्यालयास पुस्तके भेट देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार सुत्रावे यांनी केले. सूत्रसंचलन  भीमा सुरवसे यांनी केले. तर ऍड. ओंकार मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानासाठी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पांचाळ सर, किरण हंगरगेकर, देवेंद्र पवार, जीवनराजे इंगळे, महेश गवळी, श्रीधर मोरे यांच्यासह म.सा.प. पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top