पावसानंतर शेतीसाठी हालचाली सुरू – तुळजापूरात बियाण्यांच्या दुकानांपुढे रांगा

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तालुक्यात आठवड्याभरापूर्वी झालेल्या सलग अवकाळी पावसामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे तालुक्यातील बरेचसे तलाव व पाणवठे भरले असून जमिनी ओलसर झाल्याने पेरणीयोग्य स्थितीत आल्या आहेत. परिणामी, खरिप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे आणि खते खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

तुळजापूर शहरातील बियाणे व खत विक्रेत्यांच्या दुकानांपुढे सकाळपासूनच शेतकऱ्यांची रांग लागलेली दिसत असून, पेरणी लवकर सुरू करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने शहरात येऊन शेतसामग्री खरेदी करताना दिसत आहेत.

खरीप हंगामासाठी सोयाबीन, मूग, उडीद, मक्याचे तसेच तुरीचे बियाणे मोठ्या प्रमाणात मागणीला आले आहे. शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, वेळेवर पेरणी झाल्यास उत्पादनात वाढ होईल व चांगले उत्पन्न मिळेल.

पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने तालुक्यात कृषी हालचालींना वेग आला असून, आगामी काही दिवसांत पेरणीची कामे जोमात सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, यावर्षी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top