महायुतीच्या पाठबळावर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी कटिबध्द - आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर / सिद्दीक पटेल
या भागाचा व्यापक आणि सर्वांगीण विकास हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून करीत असलेल्या प्रामाणिक कामाला मतदार बंधू-भगिनींनी मोठे समर्थन दिले आहे.पुढील काळात महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी कटिबध्द आहे. अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पुढे न्यावयाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी मोठे पाठबळ दिले. त्यामुळेच मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यासाठी महत्वपर्ण असलेले अनेक प्रकल्प आणि योजना पूर्णत्वाकडे आल्या आहेत.महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयामुळे राज्यातील जनतेने हा कौल दिला आहे.आपण केलेल्या प्रामाणिक कामावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मतदारांचे धन्यवाद मानले आहेत.
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात सलग दुसर्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे.2014 पासून सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदार बंधू-भगिनींचे जाहीर आभार मानले. मागील 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून माजी मंत्री तथा जिल्ह्याचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना जिल्ह्यात राबविल्या. एका निर्णायक टप्प्यापर्यंत धाराशिव जिल्ह्याला त्यांनी आणून ठेवले. 2001 साली त्यांच्यामुळेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. तेथून पुढच्या नव्या अर्थक्रांतीचा शुभारंभ आपण हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या मान्यवर नेतेमंडळींनी सहकार्य केल्यामुळे पश्चिम महारष्ट्रातील आपल्या हक्काचे पाणी डिसेंबर अखेरीस जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प आणि महत्वाच्या योजना महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांत एका निर्णायक टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्यात यश आले आहे. कौडगाव, तामलवाडी एमआयडीसीतील रोजगार निर्मितीला गती आली आहे. पुढील काळात रोजगार निर्मितीच्या दृष्टिने अनेक महत्वाच्या बाबी राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे. केवळ विकासकामांच्या बळावर आपण निवडणुकीला सामोरे गेलो. मतदारांनीही प्रामाणिक कामाला पसंती देत मोठे मताधिक्य देवून विजयी केले. त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पुढील काळात कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सोबतीने आपला मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
